पुणे : रासायनिक शेती विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. पर्यावरण, पाणी, जमीन आणि गोमातेचे संरक्षण करायचे असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. रासायनिक शेतीइतकेच उत्पादन नैसर्गिक शेतीतून मिळते. देशातील जनतेला विषमुक्त अन्नधान्य देऊन कर्करोगा सारख्या आजाराच्या विळख्यापासून जनतेला दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक शेती करा, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

बालेवाडी येथील क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय नैसर्गिक शेती परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले,की मी राज्यपाल नंतर, अगोदर शेतकरी आहे. हरियानातील कुरुक्षेत्रात दोनशे एकर जागेवर नैसर्गिक शेती केल्यानंतरच मी तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. रासायनिक शेतीपेक्षा कमी उत्पादन मिळते म्हणून नैसर्गिक शेती करणे टाळले जाते. पण, रासायनिक शेती इतकेच उत्पादन नैसर्गिक शेतीतून मिळते, शिवाय उत्पादन खर्चात बचत होते. रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे.

हेही वाचा : पुणे महापालिकेत सत्तेसाठी शंभरपेक्षा अधिक नगरसेवकांचे भाजपचे लक्ष्य

जमिनीतील सेंद्रिय कार्बन ०.५ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिवामृत, बीजामृत, घनामृत आणि वाफसा या चतु:सूत्रीद्वारे आपण शाश्वत शेती करू शकतो. नैसर्गिक शेती जीवाणूची शेती आहे. हे जीवाणू हवेतून नायट्रोजन आणि जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात. नैसर्गिक शेतीमुळे पिकांना पाणी कमी लागते. रासायनिक खतांची गरज भासत नाही. पर्यावरण, पाणी, जमीन आणि गोवंशाचे संरक्षण करायचे असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भर आणि विश्वगुरू बनू शकतो.

हेही वाचा : “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

नैसर्गिक शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरवर नेणार

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीविषयी लोकांना मार्गदर्शन करावे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. राज्यात आज नगदी पिके वाढली आहेत. चारा पिके कमी झाली आहेत, त्यामुळे पशुधन घटत चालले आहे. सध्या राज्यात नैसर्गिक शेतीखालील क्षेत्र दहा लाख हेक्टर आहे. ते २०२५ पर्यंत २५ लाख हेक्टरपर्यंत घेऊन जायचे आहे. नैसर्गिक शेतीविषयी केंद्राकडून मोहीम स्वरूपात काम सुरू आहे. त्याचा फायदा राज्याला होणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.