पुणे : सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या साथीने केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते पाणी साचण्याच्या प्रकाराला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी संगनमताने केलेली नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे, जागोजागी केलेली रस्ते खोदाई आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते या प्रकारामुळेच जोरदार पावसात शहर पावसात जात आहे.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< खडकवासला, पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

शहर आणि उपनगराला रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने मध्यवर्ती भागासह उपनगरात महापालिकेच्या कामाची पोलखोल केली. दीड ते दोन तास झालेल्या पावसाने शहराच्या सर्वच भागात पाणी साचले. पंचवीसहून अधिक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांबरोबरच झाडपडी आणि भिंत पडण्याच्या काही घटना झाल्या. या सर्व प्रकाराला महापालिकेचा बेजबाबदार कारभारच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ या कालावधीत ६२.४६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात झाली. या भागात ८५.०९ मिमी पाऊस नोंदविला गेला. तर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात २२.६१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. जोरदार पावसाने संपूर्ण शहर पाण्यात गेले. मात्र या परिस्थितीला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा <<< महापालिकेच्या १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षांत शेकडो किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले. सुस्थितीतील रस्ते खोदून त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. सिमेंट रस्त्यांमुळे पाण्याचा निचराच होऊ शकला नाही. पावसाळी वाहिन्या आणि पावसाळी गटारे ही अनेक रस्त्यांवर नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची यंत्रणा ज्या रस्त्यांवर आहे त्याची नियमित साफसफाई होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नाल्यांना आलेला पूर, रस्त्यांना आलेले नदीचे स्वरूप, चौकांचे झालेले तळे, त्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. नालेसफाई, पावसाळी गटारांची सफाईसाठी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केला. पण हा सगळा खर्च पाण्यातच गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या सर्व प्रकारावर महापालिका प्रशासनाने दरवेळेस प्रमाणे ‘कमी कालावधीत जास्त पाऊस झाला म्हणून ही स्थिती ओढावली’ असा खुलासा करत घडलेल्या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे.

हेही वाचा <<< पुणे : बोट दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहीजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

यंदाच्या पावसाळ्यात नवीन धोकादायक ठिकाणे निर्माण झाली. त्यामध्ये महामार्गावरून पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी प्रचंड पाणी साचले होते. कोथरूड कचरा डेपो, पौड रस्ता, सातारा रस्त्यावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय, तसेच स्वामी विवेकानंद चौक, धानोरी-लोहगाव रस्ता, विमाननगर चौक, सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलाखालील रस्त्यावरून वेगात पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागही कागदावरच आहे. मनुष्यबळाची कमतरता आपत्ती व्यवस्थापन विभागाला जाणवत आहे. पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आराखडा केला जातो तो या वेळी पण कागदावरच राहिला. त्यामुळे पुणेकरांना त्याचा फटका बसला. शहराला ओढ्यानाल्यांचे स्वरूप आले. केवळ कागदोपत्री केलेल्या उपाययोजनांमुळे शहर पाण्यात गेल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा <<< विधी अभ्यासक्रम निकालाबाबत संभ्रम

मदतीसाठी संपर्क क्रमांक

हवामान खात्याने पुढील दोन दिवस शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे घर, इमारती, सोसायटींमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ०२०-२५५०६८००/१/२/३/४ या चोवीस तास कार्यरत कक्षाशी संपर्क साधावा तसेच ०२०-२६४५१७०७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. अशा घटना घडू नयेत, यासाठी दीर्घकालीन कायमस्वरुपी उपाय केले जातील.

– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका