हिंजवडी- शिवाजीनगर मार्गिका ‘पीपीपी’ तत्त्वावरचा देशातला पहिलाच प्रकल्प

पुणे : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.  सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षांत या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून मार्गिकेचे काम होणार असून शहरातील ही तिसरी मेट्रो मार्गिका आहे.

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी आवश्यक विविध प्रकारच्या मान्यता आणि काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवडय़ाला या बाबतची विशेष आढावा बैठक घेतली जात होती. या बैठकीत प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे ९८ टक्के भूसंपादन वेगाने झाले होते. प्रस्तावित मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्थानके प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७ ’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरच राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य लाभणार आहे.

तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजित

शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. तीन वर्षांत मार्गिकेचे काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे.