रेल्वे प्रवासात दिल्लीहून पुण्यात स्थायिक होण्यासाठी आलेल्या संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांच्या पिशवीतून साडेनऊ लाख रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

जेकब दवसीया (वय ३६, मूळ रा. दिल्ली) यांनी या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेकब संगणक अभियंता आहेत. पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत ते नुकतेच रुजू झाले. त्यांचे कुटुंबीय दिल्लीत वास्तव्यास आहे. त्यामुळे कुटुंबियांसह पुण्यात वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतला. जेकब यांनी पुण्यातील विश्रांतवाडी भागात भाडेतत्त्वावर घर घेतले. जेकब आणि त्यांचे कुटुंबीय रेल्वेने पुणे स्टेशन परिसरात आले.

त्यानंतर विश्रांतवाडी भागातील घरी गेले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतून नऊ लाख ४८ हजार ९८४ रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. जेकब यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.