संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी अंध, अपंग, विधवा, निराधार तसेच वयोवृद्ध नागरिकांनी भर पावसात निदर्शने करत जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या वतीने या निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शहर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत शेकडो लाभार्थी लाभ घेत आहे, परंतु अलीकडच्या काही महिन्यात लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी कधीही सक्ती न केलेला दरवर्षी २१ हजार रूपये उत्पन्न दाखल्याची जाचक अट रद्द करावी, लाभार्थ्यांना दरमहा वेळेत पेन्शन मिळावी त्याचप्रमाणे मागील ३ ते ४ महिने या पेन्शनपासून लाभार्थी वचिंत राहिले आहेत. अनेक बँका लाभार्थ्यांना पूर्ण पेन्शन काढून देत नाहीत. काही बँकांनी उत्पन्नाच्या दाखल्याची भीती दाखवून पेन्शन बंद केली आहे. लाभार्थी होण्यापूर्वी एखाद्याचा मृत्यू परराज्यात झाला असल्यास त्या कार्यालयाची ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी, १५ वर्ष रहिवास दाखल्याची अट रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित दरेकर, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, राहुल तायडे, मारूती माने, अनसुया गायकवाड, ज्योती परदेशी, देवदास लोणकर, विल्सन चंदेलवेल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.