राज्य शासनाचा केटिरग इन्स्टिटय़ूटशी सामंजस्य करार पुणे : करोनामुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. करोना काळात हजारो कोटींचा फटका या क्षेत्राला बसला आहे. सध्या मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे. परिणामी राज्यातील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन - एमटीडीसी) कर्मचारी, स्वयंपाकींना पुण्यात आदरातिथ्य आणि स्वयंपाकाचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याकरिता एका केटिरग इन्स्टिटय़ूटसोबत राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. पर्यटकांना आनंदी ठेवणे, स्वयंपाककला, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे र्निजतुकीकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचा समावेश या प्रशिक्षणात करण्यात आला आहे. हे दोन आठवडय़ांचे प्रशिक्षण असून १४ फेब्रुवारीपासुन प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणात महामंडळाच्या राज्यातील पर्यटक निवासांमधील ६० पेक्षा जास्त स्वयंपाकींना प्रशिक्षण दिले जात आहे. याबाबत महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, ‘करोना काळातही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे केली आहेत. तसेच टाळेबंदी काळात पर्यटक कमी असल्याने महामंडळाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे. आता नव्याने महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरुण स्वयंपाकी (शेफ) यांचा मेळ साधत प्रशिक्षण देण्यास पुण्यात सुरूवात झाली आहे. या प्रशिक्षणाची संकल्पना ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची आहे. प्रशिक्षणासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने महामंडळ आणि महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटिरग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.’ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत खाद्यपदार्थ आणि पेय उत्पादन याबाबतचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाअंतर्गत प्रात्यक्षिकही देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये संस्थेच्या वतीने प्राध्यापक डॉ. सीमा झगडे, सहायक प्राध्यापक सचिन रायरीकर, अभय मनोळीकर, पूजा पवार या तज्ज्ञ प्राध्यापकांकडुन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही हरणे यांनी सांगितले.