पुणे : ‘गेली दीडशे वर्षे अव्याहत सुरू असलेली वसंत व्याख्यानमाला ही देशातील किंबहुना जगातील पहिलीच व्याख्यानमाला असेल. त्यामुळे या व्याख्यानमालेची दखल ‘युनेस्को’ने घ्यावी, यासाठी निश्चित प्रयत्न करीन,’ असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी येथे दिले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘व्हेव्हज’ या महत्त्वाच्या महोत्सवासाठी गुरुवारी मुंबईत येणार आहेत. मोदी यांना टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनेही गौरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनीही वसंत व्याख्यानमालेची दखल घ्यावी, अशी विनंती मी संधी मिळाली तर, मोदींकडे करणार आहे,’ असे शेलार यांनी स्पष्ट केले.

‘राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझा ‘युनेस्को’शी संबंध येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गडकिल्ले ‘युनेस्को’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत,’ असे नमूद करून शेलार वसंत व्याख्यानमालेबाबत म्हणाले, ‘कोणतीही ठोस साधने नसताना ही व्याख्यानमाला सुरू झाली. गेली दीडशे वर्षे व्याख्यानमाला होत असून, देशातील किंवा जगातील ही पहिलीच अशी व्याख्यानमाला असावी. त्यामुळे तिचा समावेश ‘युनेस्को’च्या यादीमध्ये व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील.’ असे शेलार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे होणारी वसंत व्याख्यानमाला हे पुण्याचे खास वैशिष्ट्य असून, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजाचा बौद्धिक स्तर उंचवावा आणि वक्तृत्त्वकलेला उत्तेजन देण्यासाठी १८७१ मध्ये सुरू केलेल्या या व्याख्यानमालेचे दीडशेवे सत्र २१ एप्रिलपासून सुरू झाले आहे. न्या. रानडे, लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, दत्तो वामन पोतदार, जयंतराव टिळक आदींनी सभेचे अध्यक्षपद भूषविले आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंत व्याख्यानमालेमुळे शहरात व्याख्यानांची संस्कृती रुजली. या व्याख्यानमालेच्या सहकार्याने पुण्यासह राज्यात विविध वसंत व्याख्यानमाला सुरू झाल्या. या व्याख्यानमालेमुळे महाराष्ट्राला नवनवीन वक्ते मिळाले आणि श्रोते घडले.- आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री