पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहराला एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाला आहे. पुढील तीन दिवस घाटमाथ्यावर मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला मुसळधार पाऊस पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी सायंकाळपर्यंत या चारही धरणांमध्ये ४.९३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १६.९३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये तब्बल १.३४ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली होती. तर, बुधवारी सायंकाळच्या तुलनेत गुरुवारी सायंकाळी ०.८५ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पुणे शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. परिणामी सलग दोन दिवसांत शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी ७ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६६ टीएमसी म्हणजेच २९.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ३.७३ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून संपूर्ण जून महिन्यात या चार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असून चार-पाच दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ६७ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात ९१ मि.मी. पानशेत धरण परिसरात ९२ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात १७ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, गुरुवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३६ मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ३३ आणि ४० मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात दहा मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये टेमघर ०.२१ ५.७६ वरसगाव १.८७ १४.५८ पानशेत २.०९ १९.६१ खडकवासला ०.७६ ३८.७६ एकूण ४.९३ १६.९३ जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात ५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या या धरणात १.६५ टीएमसी म्हणजेच १९.४५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय माणिकडोह, वडज, डिंभे, कळमोडी, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, गुंजवणी, नीरा देवघर आणि भाटघर अशा इतर धरणांमध्येही दमदार पाऊस हजेरी लावत आहे.