पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री आणि विद्यमान बंदरे, खनिकर्म मंत्री कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात खात्यातील अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या आणि पदोन्नती करून भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी करून मालमत्ता जप्त करावी. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आणि लोकपालांकडे केली आहे. मुंडे यांनी माहिती अधिकाराखाली मागविलेल्या माहितीतून हे उजेडात आल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२१ या काळात बदल्या करणे, पदोन्नती करणे, निविष्ठा (खते, बियाणे, औषधे) परवानगी देणे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कामांना मंजुरी देणे, फार्मर्स प्रोडय़ुसर कंपन्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये लाच खाणे, कृषी विद्यापीठातील बांधकामांमध्ये टक्केवारी घेणे, कृषी विभागाच्या अन्य योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. मुंडे यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून भुसे यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीबाबतची सर्व तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवून घेतली होती. त्यानुसार ईडी, सीबीआय आणि लोकायुक्तांकडे चौकशी करण्याची, भुसेंची मालमत्ता जप्त करण्याची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीने नागरिकांना राजकीय नेत्यांच्या चौकशीची मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्या चौकशीच्या मागणीबाबत मला काही मत व्यक्त करायचे नाही. - दादा भुसे, तत्कालीन कृषिमंत्री