खा.साबळे मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेणार गुजरातच्या धर्तीवर आणि चंद्रपूर जिल्हय़ाचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून राज्यातील देहू-आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्र परिसरात पूर्णपणे दारूबंदी करावी, अशी मागणी भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे. या संदर्भात, प्रमुख वारकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळय़ाच्या नियोजनासाठी पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठक घेतली. या बैठकीत साबळे यांनी दारूबंदीची मागणी केली. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, देहू-आळंदी आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत. लाखोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे पावित्र्य राखण्यासाठी या परिसरात दारूविक्री होता कामा नये, अशी आपली भूमिका आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे दारूबंदी आहे. तर मग या तीन ठिकाणी दारूबंदी का होऊ शकत नाही, असा मुद्दा साबळे यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांच्या बैठकीत आपण हा मुद्दा मांडला, त्यानंतर वारकरी सांप्रदायातील अनेक जणांनी या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. दोन्ही पालखी मंडळांतील प्रमुखांना सोबत घेऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे दारूबंदीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दोन्ही पालखी मंडळांतील प्रमुखांना सोबत घेऊन आपण मुख्यमंत्र्यांकडे दारूबंदीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.