बारामती: ‘श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत मी सहभागी होणार नव्हतो. मात्र, कारखाना अडचणीत असताना रणांगण सोडणे, हा पळपुटेपणा होईल. म्हणून या निवडणुकीत लक्ष घातले आहे.’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराला इंंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील भवानी माता मंदिर येथून सोमवारी सुरुवात करण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, किरण गुजर उपस्थित होते.
‘मला सुरुवातीला महाराष्ट्र ओळखत नव्हता. वडिलांच्या आणि चुलते आप्पासाहेब पवार यांच्या पुण्याईने कारखान्यावर काम करण्याची संधी मिळाली. आज मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. अनेक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद याच लोकांमुळे मिळाले आहे. छत्रपती साखर कारखाना अडचणीत असताना रणांगण सोडणे, हा पळपुटेपणा होईल. त्यामुळे या निवडणुकीत लक्ष घातले आहे.’ असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
‘अनेकांनी आपापल्या कारकिर्दीत राज्यातील सहकारी चळवळ मजबूत करण्याचे काम केले. आजवर देश पातळीवर सहकार विभाग वेगळा नव्हता. तो कृषी विभागाअंतर्गत होता. शरद पवार हे दहा वर्षे कृषिमंत्री असताना कृषीखातेअंतर्गत सहकार, पशुसंवर्धन असे अनेक विभाग होते. मात्र, देशात सहकार विभाग मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार विभाग स्थापन केला. देशात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन ठिकाणी अन्य राज्यांपेक्षा सहकार क्षेत्र मजबूत आहे.’ असे पवार यांनी सांगितले.
‘विरोधक जुनी भाषणे दाखवतील’
‘विरोधक मोबाईलच्या माध्यमातून अफवा निर्माण करू शकतात. जुनी भाषणे दाखविण्याचा प्रयत्न करतील. यापूर्वी अनेकदा शिवसेनेच्या विरोधात भाषणे केली. शिवसेनेबरोबर जायचे असल्याचे वरिष्ठांनी सांगितले. वरिष्ठांच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र काम केले. शेवटी आपण वैयक्तिक स्वार्थासाठी समाजकारण, राजकारण करतो की समाजाच्या भल्यासाठी, हे महत्त्वाचे आहे.’ असे अजित पवार यांनी सागितले.