scorecardresearch

शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर संभाजीराजेंची जाहीर नाराजी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी…”

शिवभक्तांना गडावर येण्यास अडवल्याने माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीसांसमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

devendra fadnavis ad sambhajiraje chhatrapati and shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज, देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे छत्रपती, (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, यावेळी शिवभक्तांना गडावर येण्यास अडवल्याने माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीसांसमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) शिवनेरीवर शासकीय कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो आहोत आणि आज मानाने जगतो आहोत. म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा, आपल्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण येत असतो. आज छत्रपती संभाजीराजे यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेशही दिले आहेत.”

“पुढच्या वर्षी अशाप्रकारे कोणाचीही अडवणूक होणार नाही”

“येत्या काळात त्याबाबत योग्य नियोजन केलं जाईल. पुढच्या वर्षी अशाप्रकारे कोणाचीही अडवणूक होणार नाही यासाठी नियोजन करू,” असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.

“डीपीडीसीमध्ये प्रतिवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवणार”

फडणवीस पुढे म्हणाले, “मला एक गोष्ट सांगताना समाधान होत आहे की, हे सरकार आल्यावर आम्ही सगळ्या डीपीडीसीमध्ये प्रतिवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. आपण जो निधी देतो त्याव्यतिरिक्तचा हा निधी राखून ठेवला जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी हा निधी उपलब्ध होईल.”

हेही वाचा : “मी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितली आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला…”

“शिवभक्तांना बरोबर घेऊन १ वर्ष सातत्याने महाराजांचा विचार जनतेपर्यंत पोहचवणार”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सरकारने सर्व शिवभक्तांना बरोबर घेऊन १ वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारकं जनतेपर्यंत पोहचवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2023 at 11:33 IST

संबंधित बातम्या