भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीला पोलीस सुरक्षा पुरवू शकत नसतील तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. इतरच नाही तर फडणवीस यांनी थेट सध्या सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

नक्की वाचा >> “पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे नोकर आहेत का?, खून करण्याचा…”; हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सोमय्यांची संतप्त प्रतिक्रिया

फडणवीस नेमकं काय म्हणाले?
२४ तासांपूर्वी कंबोज यांच्यावर हल्ला, राणा दांपत्याला अटक आणि आता सोमय्यांच्या गाडीवर हल्ला. यासंदर्भात तुम्ही काही ट्विट केलेत तर त्याचा अर्थ काय असा प्रश्न पत्रकरांनी फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी, “आता प्रश्न एवढाच आहे किरीट सोमय्या हे झे प्रोटेक्टीव्ह आहेत. त्यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं की मी पोलीस स्थानकामध्ये येत आहे. भेट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं की ७०-८० ते १०० लोकांचा जमाव बाहेर आहे. तो जमाव माझ्यावर हल्ला करणार हे त्यांच्यातर्फे अधिकृतपणे कळवण्यात आलेलं. माझ्यावर असा हल्ला होणार आहे, पोलीस स्थानकाच्या आवारात होणार आहे त्यामुळे आधी तुम्ही क्लिअरन्स करा मग त्यानंतर मी बाहेर जाईन इतकं क्लिअरली सांगितल्यानंतरही पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही कारवाई केली नाही उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला तिथल्या स्थानिक लोकांना, शिवसैनिकांना, गुंडांना परवानगी दिली. म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडगर्दी चालली आहे,” असा संताप व्यक्त केला.

मुंबई पोलिसांची अब्रू आता…
“खरं म्हणजे शरम वाटायला पाहिजे पोलिसांना की त्यांनी झेड प्लस प्रोटेक्टीव्हने माहिती दिल्यानंतरही त्यांना सुरक्षा देऊ शकत नसतील तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे. मुंबई पोलिसांची अब्रू आता या पोलिसांनी घालवलीय. देशातील सर्वोत्तम पोलीस दल आज इतक्या दबावाखाली सरकारच्या नोकरासारखं वागतंय. लोकशाही पायाखाली तुडवली जातेय. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” असंही फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> मुंबईत शिवसेना भाजपा संघर्ष शिगेला! किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक; गाडीच्या काचा फुटून सोमय्या जखमी

सरकारला दिला इशारा…
तसेच पुढे बोलताना, “उद्या मी स्वत: यासंदर्भात म्हणजेच किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात गृह सचिव आणि गृहमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांना पत्र लिहिणार आहे. उद्या मागणी करणार आहे की या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, जे पोलीस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागतायत. त्यांच्यासमोर त्यांच्या संरक्षणात जर अशाप्रकारचे हल्ले होत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही,” असंही फडणवीस म्हणाले. तसेच, मी आज सरकाला इशारा देतोय की आम्हाला तुम्ही या ठिकाणी घाबरवू शकत नाही,” असंही फडणवीसांनी म्हटलंय.

नवनीत राणांच्या अटकेसंदर्भातही केलं भाष्य
“एवढचं नाही सगळी कलमं जामीनपात्र असतानाही देखील, रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कोठडीत जामीनपात्र गुन्ह्यामध्ये ठेवता येत नाही. माहिती असतानाही कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय पायदळी तुडवून त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येतयं. एकूणच हा सगळा प्रकार गंभीर आहे,” असं फडणवीस म्हणालेत.