डिजिटल व्यवहार नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यात दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत. ‘वर्ल्डलाइन इंडिया’ने २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीतील डिजिटल व्यवहारांचा अहवाल नुकताच जाहीर केला. डिजिटल व्यवहारांमध्ये देशात पहिल्या स्थानी बंगळुरू असून, दुसऱ्या स्थानी नवी दिल्ली, तिसऱ्या स्थानी मुंबई, चौथ्या स्थानी हैदराबाद आणि पुण्याचे स्थान पाचवे आहे. देशातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ११ टक्के व्यवहार एकट्या पुण्यात होतात. हे प्रमाण २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ८ टक्के होते. त्यात ३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील डिजिटल व्यवहारांच्या एकूण उलाढालीपैकी १० टक्के उलाढाल पुण्यात होते. ही उलाढाल २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ६ टक्के होती आणि त्यात आता ४ टक्के वाढ झालेली आहे.

डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून नागरिक विविध प्रकारचे व्यवहार करीत आहेत. त्यात सर्वाधिक प्राधान्य किराणा दुकान आणि सुपर मार्केटमधील खरेदीला आहे. याचबरोबर हॉटेल, बेकरी, दूरसंचार सेवा, सेवा केंद्रे, डिजिटल गेम, पान टपरी, औषधविक्री दुकाने या ठिकाणी नागरिक डिजिटल व्यवहारांना पसंती देत आहेत. पाणी, वीज, गॅसची देयके देण्यासाठीही प्रामुख्याने डिजिटल पर्यायाकडे नागरिकांचा ओढा आहे.देशभरातील डिजिटल व्यवहारांचा विचार करता मोबाइलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढले आहेत. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. हे व्यवहार प्रामुख्याने मोठ्या रकमेचे आहेत. याच वेळी डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) प्रणालीच्या माध्यमातून व्यवहार वाढू लागल्याने डेबिट कार्डची पसंती कमी होऊ लागली आहे. याच वेळी प्रीपेड कार्डचा वापरही वाढताना दिसत आहे. वाहनांची संख्या वाढू लागल्याने फास्टॅग खात्यांसह व्यवहारांमध्येही वाढ होत आहे.

देशात जुलै ते डिसेंबर २०२४ या सहामाहीत ‘यूपीआय’च्या माध्यमातून १६.७३ अब्ज व्यवहार झाले. हे व्यवहार एकूण २३.२४ लाख कोटी रुपयांचे आहेत. यूपीआय व्यवहारांचे सरासरी मूल्यही वाढू लागले आहे. ते आता १ हजार ५१५ रुपयांवर पोहोचले आहे. २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत यूपीआय व्यवहारांची संख्या आणि उलाढाल यात अनुक्रमे ४२ टक्के आणि ३१ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे केवळ व्यवहारांची संख्याच नव्हे, तर उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वच पथकर नाक्यांवर आता फास्टॅग बंधनकारक आहे. त्यामुळे फास्टॅगच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ८ कोटी १२ लाख फास्टॅग होते. ही संख्या २०२४च्या दुसऱ्या सहामाहीत १० कोटी ३१ लाखांवर पोहोचली असून, त्यात २६ टक्के वाढ झाली आहे. फास्टॅगच्या माध्यमातून २ अब्ज व्यवहार झाले असून, एकूण उलाढाल ३५६ अब्ज रुपये आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात १२ टक्के वाढ झालेली आहे.

रोकडविरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने

डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत पुण्याने देशात पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान पटकावले असून, यातून पुण्याची डिजिटल क्षमता दिसते. रोकडविरहित अर्थव्यवस्था पुणे वेगाने स्वीकारत असल्याचे हे निदर्शक आहे. हे यश तंत्रज्ञानस्नेही नागरिक, भक्कम फिनटेक क्षेत्र आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा याद्वारे शहरातील डिजिटल परिसंस्थेला बळ मिळत आहे. पुणेकरांनी डिजिटल व्यवहारांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केल्यामुळे केवळ दैनंदिन व्यवहार सुलभ होत नाहीत, तर आर्थिक समावेशकतेला चालना मिळून आर्थिक विकासालाही गती मिळत आहे, असे ‘वर्ल्डलाइन इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नरसिंहन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sanjay.jadhav@expressindia.com