आपत्ती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होत असून महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सद्य:स्थितीत शहरासह जिल्ह्य़ात मोसमीपूर्व पाऊस पडत आहे. या पाश्र्वभूमीवर पावसाळ्यातील आपत्ती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्य़ातील सर्व विभागांची बैठक पार पडली. बैठकीत पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती, त्याबाबत घ्यायची काळजी याबाबत सूचना देण्यात आल्या. जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांत, तहसीलदार, ग्रामीण पोलीस अधीक्षक, शहर पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जिल्ह्य़ातील सर्व धरणांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घेणे, धरणांमध्ये सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर करायच्या उपाययोजनांचा आराखडा निश्चित करणे, धरणातून पाण्याचा विसर्ग करताना नागरिकांना सतर्क करणे व याबाबत जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षाला कळवणे, पूररेषा ठळक करून नदीपात्रातील गाळ काढणे, धरणाच्या खालील बाजूस असलेल्या आणि पुरामुळे संभाव्य बाधित गावांची यादी जिल्हा नियंत्रण कक्षाला देणे, अशा सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ातील जुने पूल, इमारती यांची बांधकाम तपासणी, आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारे बुलडोझर, झाडे कापण्याचे कटर, जनरेटर, आर.सी.सी कटर चालू स्थितीमध्ये ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य नियंत्रण स्वतंत्र कक्ष स्थापणे, रुग्णवाहिकांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ससून सवरेपचार रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्या आहेत. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीचे मूल्य ठरवणे, शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी तहसीलदारांच्या मदतीने पथकाची स्थापना करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी गुरुवारी दिली आहे. याबरोबरच जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभाग, हवामान खाते, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनादेखील सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यातील आपत्ती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य नियंत्रण स्वतंत्र कक्ष स्थापणे, रुग्णवाहिकांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ससून सवरेपचार रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्या आहेत. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानीचे मूल्य ठरवणे, शेतीच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी तहसीलदारांच्या मदतीने पथकाची स्थापना करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी गुरुवारी दिली आहे. याबरोबरच जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभाग, हवामान खाते, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनादेखील सूचना दिल्या आहेत.

पालिकेकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

पावसाळ्याच्या तोंडावर दुर्घटना घडू नये आणि कामे तत्काळ मार्गी लागावीत, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महापालिका मुख्य भवन आणि क्षेत्रीय कार्यालयात या अधिकाऱ्यांमार्फत समन्वय साधण्याचे काम करण्यात येणार आहे. नालेसफाई, रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रकार, राडारोडा, तुंबलेली गटारे, धोकादायक झाडे आदी कामांवर या अधिकाऱ्यांची देखरेख राहणार आहे.  प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एका विभागप्रमुखाची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परिमंडळाचे उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त यांच्याशी समन्वय साधून हे अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची जबबादारी त्यांना देण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या कामांचे ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे अहवाल दर सोमवारी  हे अधिकारी आयुक्तांना सादर करणार आहेत. दरम्यान, आपत्ती व्यवस्थानाचा आराखडाही करण्यात आला असून पूरपरिस्थितीची संभाव्य ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

महापालिकांना सूचना

पूर नियंत्रण आराखडा तयार करणे, शहरी भागात नदीलगत झोपटपट्टय़ांमध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करणे व त्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराचा आराखडा करणे, पावसाळ्यात वादळी-वाऱ्यासह झाडे पडून मनुष्य व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक झाडांची छाटणी करणे, महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला देणे, नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, सर्व जुने पूल व इमारतींची बांधकाम तपासणी करणे अशा सूचना पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना केल्या आहेत.

संकटकाळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

शहरासह जिल्ह्य़ात पावसामुळे पूरग्रस्त परिस्थिती ओढवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कक्षात दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून विविध विभागातील कर्मचाऱ्यांना काम वाटून देण्यात आले आहे, असेही बनोटे यांनी सांगितले.