पाणीसाठा ९४ टक्क्यांवर

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पावसाने उघडीप दिल्याने पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तूर्त थांबवण्यात आला आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांच्या परिसरात रात्रीतून पाऊस पडल्यास पुन्हा विसर्ग करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. सध्या पानशेत आणि खडकवासला ही दोन धरणे १०० टक्के  भरली आहेत. त्यामुळे पानशेत धरणातून खडकवासला धरणात, तर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी पाच वाजता खडकवासला धरणातून ४२८० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते, सकाळी दहा वाजता ३४२४ क्युसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला. दुपारी बारा वाजता पानशेत धरणामधून खडकवासला धरणात सुरू असलेला विसर्ग थांबवण्यात आला, तर दुपारी खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग थांबवण्यात आला.

दिवसभरात टेमघर धरण परिसरात पाच मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे चार आणि तीन मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात अवघ्या एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पवना धरण परिसरात १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या धरणात सध्या ९२.२८ टक्के  पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्य़ाच्या अन्य धरणांच्या परिसरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, गुंजवणी आणि वीर ही धरणे १०० टक्के  भरलेली असल्याने या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात सध्या ५७.५० टक्के  पाणीसाठा झाला आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसीमध्ये

(कं सात टक्क्यांमध्ये)

टेमघर ३.०६ (८२.५२), वरसगाव ११.९८ (९३.४८), पानशेत १०.६२ (९९.७१), खडकवासला १.९३ (९७.६०), पवना ७.८५ (९२.२८), भामा आसखेड ६.५७ (८५.६९)