मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अक्षय्य तृतीया निमित्ताने ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरात महाआरती करण्यात येणार होती. पण रविवारी राज ठाकरे यांची सभा झाल्यावर चर्चा करून, ३ तारखेची महाआरती स्थगित करून ४ मे रोजी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात येणार आहे,अशी माहिती मनसेचे सर चिटणीस अजय शिंदे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे न काढल्यास त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना, कुमठेकर रोडवरील हनुमान मंदिरात महाआरती करत हनुमान चालीसाचे पठण देखील झाले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्यात येणार आणि अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्यास जाणार असल्याचे जाहीर केले होते.

या सर्व घडामोडीनंतर काल औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असताना, आता अक्षय तृतीय निमित्ताने मनसेकडून राज्यभरात घेण्यात येणारी महाआरतीला स्थगिती देऊन ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.