संस्थांची जाहिरातबाजी आणि मार्केटिंगने विद्यार्थी जेरीस; अनेक संस्था डबघाईला विद्यार्थ्यांचा तुटवडा भासणाऱ्या व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांच्या जाहिरातबाजीने आणि मार्केटिंगने आता विद्यार्थीच जेरीस आले आहेत. विद्यार्थ्यांची माहिती आणि संपर्क क्रमांक मिळवून आपल्याच संस्थेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागे या संस्था लागल्या आहेत. मात्र या संस्थांना विद्यार्थ्यांचे तपशील मिळाले कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गरजेपेक्षाही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या अधिक संस्था राज्यात उभ्या राहिल्यामुळे या संस्थांना गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. आता संस्था बंदही करता येत नाही आणि सुरूही ठेवता येत नाही अशा अवस्थेत असलेल्या अनेक संस्थांनी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पटवण्याचा उद्योग सुरू केला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि तपशील शिक्षणसंस्थांच्या प्रतिनिधींना कसे मिळाले असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. सध्या व्यवस्थापन शाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची नोंदणी, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि त्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेसाठी आलेल्या अर्जाची संख्या वाढल्यामुळे आनंदात असलेली महाविद्यालये विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यावर मात्र आता पुन्हा एकदा तणावग्रस्त झाली आहेत. आपल्याकडेच विद्यार्थी यावेत यासाठी संस्थांनी जाहिरातबाजी सुरू केली आहे. वेगवेगळ्या सवलतींची जाहिरात करण्यासाठी मोबाईल कंपन्यांचे जसे ग्राहकांना फोन करतात, त्याप्रमाणे महाविद्यालये आणि काही संस्था विद्यार्थ्यांना फोन करून आपल्याकडेच प्रवेश घेणे कसे योग्य आहे ते सांगत आहेत. साधारण पुढील आठवडय़ापासून महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देण्याचा टप्पा सुरू होईल. त्या वेळी आपल्याच महाविद्यालयाचे नाव द्यावे असा आग्रह करणारे दूरध्वनी विद्यार्थ्यांना करण्यात येत आहेत. बल्क एसएमएसचा वापर करूनही महाविद्यालयाच्या जाहिराती सुरू आहेत. याबाबत सिद्धार्थ अगरवाल या विद्यार्थ्यांने सांगितले, ‘मी अर्ज करून कागद पडताळणी करणाऱ्या केंद्रावर अर्ज दिला. त्यानंतर मला तीन महाविद्यालयांचे फोन आले. महाविद्यालयांत काय सुविधा आहेत, प्लेसमेंट कशा आहेत अशी माहिती दिली गेली. माहिती मिळते कुठून? विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाकडे असते. जेथे विद्यार्थी कागदपत्रांची पडताळणी करतात तेथे ही माहिती गोळा करण्यात येते. या केंद्रांकडूनही काही मोबदल्यात महाविद्यालये ही माहिती मिळवतात, असे एका व्यवस्थापन संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमिषे काय? महाविद्यालयात सुविधा आहेत, चांगल्या प्लेसमेंट्स दिल्या जातात, अथवा महाविद्यालयातच तासिका तत्त्वावर शिकवण्याची संधी दिली जाते, रोज येण्याची आवश्यकता नाही, नोकरी करतानाही अभ्यासक्रम करू शकता, तयार छापील नोट्स पुरवल्या जातात, शुल्कात सवलत दिली जाईल. हे लक्षात ठेवा.. * एमबीएची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीनेच होते. * कोणतीही आमिषे आणि संस्थांच्या दलालांना बळी पडू नका. * तंत्रशिक्षण विभागानेच निश्चित केलेली प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असते, अन्यथा प्रवेश रद्द ठरू शकतो. * नियमानुसार एमबीए हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, त्यामुळे महाविद्यालयांत हजेरी आवश्यक आहे.