‘समाज फक्त शिक्षणाने सुसंस्कृत होत नाही, तर तो चांगल्या संस्कारांनी होतो. शिक्षणाचा धंदा होणार नाही, याची काळजी सर्वानीच घेणे गरजेचे आहे,’ असे मत प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतवर्षांतील पदापर्णानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, डॉ. ए. के. संचेती, प्रा. राहुल कराड, डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. पटेल म्हणाले, ‘लोकशाही टिकवायची असेल, तर सगळ्यांना आपापले धर्मग्रंथ घरी ठेवावे लागतील. राज्यघटना हाच धर्मग्रंथ मानून चालले, तरच सामाजिक स्वास्थ्य राहील आणि शांततेच्या संदेशाला खरा अर्थ प्राप्त होईल. दुसऱ्या महायुद्धाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना. वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करणारे डॉ. कराड शांतीचा संदेश देतात, हा विलक्षण योगायोग आहे.’’
या वेळी डॉ. कराड म्हणाले, ‘एकविसावे शतक भारताचे म्हटले जात असताना, आज आपल्याला भारतीय संस्कृतीचाच विसर पडल्याचे जाणवते. अंधश्रद्धेसारख्या गोष्टी या भारतीय संस्कृतीला कलंक आहेत. सध्या आपल्या संस्कृतीबद्दल चिंतन करण्याची आवश्यकता आहे.’