पुणे : ब्रेक निकामी होऊन नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पुण्यातील नवले पुलावर घडली. या अपघातात ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला.
अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरने रांगेत असलेल्या पुढील वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. छोट्या मोठ्या मिळून १० ते १२ वाहनांना कंटेनरने उडवल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनरच्या धडकेत मोटार चेपली गेल्यामुळे त्यातील प्रवाशांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतले. घटनास्थळी दोन कंटेनर आणि त्यामध्ये चारचाकी वाहन अडकल्याने पेट घेतला होता. कंटेनरमधून दोन पुरुष आणि मोटारीमधील दोन पुरुष, दोन महिला व मुलगी असे एकूण सात जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतूक पोलिसांनी दोन तासांसाठी बंद ठेवली होती.
प्रवासी वाहनात अडकले
कंटेनरचालकाने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे आग लागली होती. चालकांसह प्रवासी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीसाठी आरडाओरडा करीत होते. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे कुणालाच त्यांच्या मदतीसाठी पुढे जाता येत नव्हते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
कात्रज ते नवले पूल या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील तीव्र उतार कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे</p>
२५ जानेवारी : पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. हे तरुण रात्री पार्टी करून मोटारीतून निघाले होते. उतारावर नियंत्रण सुटल्याने ही मोटार थांबलेल्या बसला मागून धडकली.
३ मे २०२५: अपघातात दुचाकीवरील तरुण ठार झाला होता. मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. याच दिवशी दुपारी झालेल्या अपघातात एका मालमोटारीचे ब्रेक निकामी झाल्याने दुचाकीस्वार ठार झाला होता.
●भरधाव टँकरचालकाने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना १० फेबुवारी २०२४ रोजी नवले पुलावर घडली होती. नवले, भूमकर पूल परिसरात यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात झाले आहेत.
●नवले पूल परिसरात एकापाठोपाठ झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.
●बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. उतारावर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
