पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये मिळून १८.६३ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. ही चारही धरणे ६३.९२ टक्के एवढी भरली असून त्यामध्ये १८.६३ टीएमसी एवढा पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून रविवारी देण्यात आली.

रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली असून येथे ३६ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी १२ मिलिमीटर पाऊस झाला असून खडकवासला धरण परिसरात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. टेमघरमध्ये १.९९, वरसगावमध्ये ८.७६, पानशेतमध्ये ६.६५ आणि खडकवासला धरणामध्ये १.२३ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या चारही धरणांमध्ये मिळून ५.६६ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १२.९७ टीएमसीने जास्त असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.