महावितरणकडून डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्याबाबतची माहिती महावितरणने जाहीर केली असून, महावितरणच्या परिमंडळानुसार वीजचोऱ्या पाहिल्यास राज्यात मराठवाडा,. विदर्भापेक्षा कोकण विभागात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत अधिक वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. हेही वाचा >>>पुणे: “कुस्त्या पाहण्यास CM आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ,पण आंदोलनाकडे पाठ”; MPSC विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल डिसेंबर महिन्यात सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने केलेल्या कारवाईमध्ये उघड झालेल्या ८७९ प्रकरणातील ११ कोटी ६९ लाख रुपयांच्या वीजचोरीपैकी कोकण परिक्षेत्रात ४ कोटी ४० लाख रुपयांची २४९ प्रकरणे उघडकीस आली. पुणे परिक्षेत्रात ३ कोटी ६८ लाख रुपयांची १३५ प्रकरणे उघडकीस आली. नागपूर परिक्षेत्रात २४४ प्रकरणांमध्ये १ कोटी ७२ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली, तर औरंगाबाद परिक्षेत्रात १ कोटी ८८ लाख रुपयांची २५१ वीजचोरी प्रकरणे उघड झाली. हेही वाचा >>>पुणे : आता लक्ष्य ऑलिम्पकचे अभिजीत कटकेचे मनोगत सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत भरारी पथकांमार्फत एकूण ६८०१ प्रकरणे उघडकीस आणली. त्यामध्ये ८६ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याखेरीज इतर अनिमितता असलेल्या एकूण ६३३६ प्रकरणांमध्ये १६७ कोटी ११ लाख रुपयांची देयके देण्यात आली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या सर्व मुख्य अभियंत्यांना वीजचोरी रोखण्यासाठी आक्रमकपणे कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. कंपनीच्या भरारी पथकाखेरीज स्थानिक कर्मचाऱ्यांनीही सजगपणे वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याचा व कारवाई करण्याचा आदेश त्यांनी दिला. प्रत्येक सर्कल पातळीवर याबाबत पाठपुरावा करण्याचाही आदेश त्यांनी दिला.