पुणे : राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून अकरा दिवस उलटून गेले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या नाही. शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रस्ताव देऊन आठ दिवसांनंतर शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला नसल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. शिक्षण विभागाकडून मुंबई महानगर प्रदेश, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मे महिन्यातच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासह नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची मुभा देण्यात आली. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदवणे आदी प्रक्रिया राबवली जाणार होती. त्यानुसार १७ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रियेची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत मुंबईतील २ लाख ४६ हजार ७४९, पुणे-पिंपरी चिंचवडमधील ८१ हजार ४५२, नागपूरमधील २५ हजार ३९४, नाशिकमधील २२ हजार ३८१, मात्र शिक्षण विभागाकडून काहीच सूचना दिल्या जात नसल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी शिक्षण संचालनालयाच्याच स्तरावर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करून प्रक्रिया राबवली जाते. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष सुरू झाला. अद्याप प्रवेश प्रक्रियेच्या प्रस्तावाबाबत शासनाकडून निर्णय झालेला नसल्याने प्रवेश प्रक्रिया राबवता येत नाही. या संदर्भात माहिती घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सीबीएसई, आयसीएसईच्या निकालाची प्रतीक्षा? दरवर्षी राज्य मंडळाच्या निकालापूर्वी सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर होतात. तर राज्य मंडळाकडून दहावीचे निकाल जाहीर झाल्यावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र यंदा राज्य मंडळाकडून दहावीचे निकाल जाहीर होऊनही सीबीएसई, आयसीएसईने दहावीचे निकाल जाहीर झालेले नाहीत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत या विद्यार्थ्यांचाही सहभाग असल्याने सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या निकालाची शिक्षण विभाग वाट पाहात आहे का, असाही प्रश्न आहे.