यंदाच्या द्राक्ष हंगामात महाराष्ट्रातून जगभरात द्राक्षांची निर्यात सुरू आहे. देशातून आजवर १ लाख २५ हजार टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यापैकी युरोपला ३८,५५६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीत राज्याचा वाटा जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत आहे. मार्च, एप्रिल महिन्यांत वेगाने द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देशातून सव्वा लाख टन द्राक्षांची निर्यात झाली असून, प्रामुख्याने बांगलादेशला ३१६५९ टन, संयुक्त अरब अमिरातीला ४७२८ टन, नेपाळला ६४१३ टन आणि रशियाला ११६८ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. युरोपला देशातून ३८.५५६ लाख टनांची निर्यात झाली आहे, त्यात राज्याचा वाटा ३८,५३१ टन इतका आहे. नेदरलँण्डला सर्वाधिक २८७२८ टन, ब्रिटनला ३४०७ टन, जर्मनीला २०१२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.राज्यात नाशिक जिल्ह्याने निर्यातीत मोठी आघाडी घेतली आहे. नाशिकमधून ३५७९९ टन, सांगलीतून १६०२ टन, सोलापुरातून ५७१ टन, नगरमधून २०० टन, पुण्यातून १७३ टन, लातूरमधून ५० तर उस्मानाबादमधून ३२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. बांगलादेशचा १२० टक्के करराज्यातील द्राक्षांना बांगलादेशातून मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातून सुपर सोनाक्का, आनुष्का आदी वाणांच्या द्राक्षांची बांगलादेशाला निर्यात होते. यंदा बांगलादेशाने शेतीमालाच्या आयातीवर १२० टक्के आयात कर लादला आहे. त्यामुळे हजार रुपयांच्या द्राक्षाच्या क्रेटला १२०० रुपये कर भरावा लागतो आहे. याचा विपरीत परिणाम निर्यातीवर होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.बांगलादेशने भारतातून होणाऱ्या कृषीमालाच्या आयातीवरील कर वाढवला आहे. हा अपवाद वगळता जगभरात द्राक्ष निर्यात विनाअडथळा सुरू आहे. मार्च, एप्रिल महिन्यात निर्यातीचा वेग आणखी वाढेल.- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी विभाग