शेतमालास हमी भाव आणि कर्ज माफी यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी राजा गुरूवारपासून संपावर गेल्याने बाजारपेठेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यातील मार्केटयार्डात आज फक्त १० टक्के मालाची आवक झाली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्केटयार्डात शुकशुकाट पाहावयास मिळाला. तसेच उद्या मार्केटयार्ड बंद असल्याने अजून भयाण पारिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारचा निषेध म्हणून शेतकरी रस्त्यावर दुधाचे टँकर ओतून देत आहे. पालेभाज्या रस्त्यावर फेकून दिले जात आहेत. तरी देखील राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. या संपाला पुण्यातही प्रचंड प्रतिसाद मिळत असून येथील मार्केडयार्डात दररोज १३०० ट्रक घेऊन माल येत असतात. मात्र आज ११० ते १३० मालाचे ट्रक आले. त्याचबरोबर मार्केटयार्डात १० टक्के मालाची आवक झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने फळभाज्या, पालेभाजी आणि कांद्याची आवक झाली असून मिरची, कोबी हा माल पुणे, नगर आणि कर्नाटक मधून आवक करण्यात आला आहे. कमी माल असल्याने दरही दुप्पट झाले आहे. याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या परिस्थितीवर राज्य सरकारने लवकरच मार्ग न काढ़ल्यास कठीण पारिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.