पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात शुक्रवारी एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात वाहनाांचे नुकसान झाले. जोरदार धडक दिली.
नवले पुलाजवळ असलेल्या सिग्नलच्या परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघाताची घटना घडली. सिग्नल वाहने थांबले होती. त्या वेळी कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. तीव्र उतारावर एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. अपघातानंतर काही काळ या भागातील वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या सात किलोमीटरच्या अंतरात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अवजड वाहनचालकांकडून सर्रास नियम धुडकाविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. नवले पुलावर १३ नाेव्हेंबररोजी साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
अपघातात नऊ ते दहा जण गंभीररीत्या जखमी झाले. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात घडलेल्या गंभीर स्वरूपाचे अपघात यापूर्वी घडले आहे. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल परिसर सात किलोमीटर अंतर तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या भागात भरधाव अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर अपघात घडले आहेत. नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नवले पूल परिसरात झालेल्या अपघातांत अनेक बळी गेले आहेत.
नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या भागात होणारे अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. आप्तकालीन उपाययोजनासंदर्भात विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नऱ्हे ते रावेत (सुतारवाडीमार्गे) दरम्यान उन्नत पुलाचा प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार, केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलीी होती.
अतिवेगामुळे अपघात
बाह्यवळण मार्गावरील दरी पूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. बहुतांश अपघात अवजड वाहनांचे झाले असून तीव्र उतारावर गाडी न्यूट्रल स्थितीत चालविल्याने अपघात घडतात. न्यूट्रल स्थितीत गाडी चालविताना अचानक ब्रेक दाबल्यास ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. त्यामुळे ट्रक, टँकर अशा अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्गावर स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यात आली. वेगमर्यादेबाबात या भागात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
बाह्यवळण मार्गाचा वापर करणारे अवजड वाहनचालक परराज्यांतील आहेत. त्यांना वाहतूक नियमांची माहिती मिळावी, यासाठी विविध भाषांत फलक लावण्यात आले आहेत, तसेच नवले पूल परिसरात वाहतूक पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. डंपर, कंटेनर, ट्रकचालकांच्या बेदरकारपणामुळे नवले पूल परिसरात गंभीर अपघात घडले आहेत. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी दरी पूल ते नवले पूल दरम्यान गतिरोधक पट्टिका (रम्बलिंग स्ट्रिप) लावण्यात आल्या आहेत.
