पुणे : ‘महापुरुषांनी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. आज देशात जात, उपजात आणि धर्माच्या नावाने भांडणे होत आहेत. महापुरुषांची जयंती साजरी करताना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी बुधवारी व्यक्त केले.
गिर्यारोहक उमेश झिरपे यांना महाराष्ट्र वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे पवार आणि खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते ‘वीरशैव भूषण पुरस्कार’ देण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, माजी नगरसेवक ॲड. अभय छाजेड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिल गाढवे, सुनील रुकारी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘बसवेश्वरांनी केवळ विचार सांगितला नाही. तो प्रत्यक्षात आणून दाखवला. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री-पुरुष समानतेसाठी आयुष्य वेचले. जे आज करणे अवघड झाले आहे, ते बसवेश्वरांनी शेकडो वर्षांपूर्वी केले. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मानवतेचा संदेश दिला. त्यांनी जगाला मानवतेची दिव्य दृष्टीच दिली. मात्र, आज डोळस माणसेही अंध झाली आहेत. समाजाने बसवेश्वरांचे विचार आत्मसात करायला हवेत, तेव्हाच आपली खरी प्रगती होईल.’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन प्रमुख डॉ. शामा घोणसे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या,‘स्त्री-पुरुष समानता हा वीरशैव धर्माचा गाभा आहे. बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. लोकशाहीचे स्वरूप या धर्मात आहे. प्रत्येकजण आपलाच आहे, अशी शिकवण वीरशैव पंथात दिली जाते.’
‘माणसात साहस करण्याची वृत्ती खूप आधीपासून आहे. गिर्यारोहणाला साहसी खेळाचा जनक म्हणतात. एखादा पर्वत सर केल्यानंतर मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. या अनुभवाने जगणे बदलून जाते. माणूस ताण-तणावापासून मुक्त होतो. प्रत्येकाने निसर्गाच्या जवळ जात असे साहस करायला हवे,’ असे झिरपे म्हणाले.
डॉ. शिवाजीराव काळगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. नरसिंग मुळे यांनी आभार मानले. नरेंद्र सोलापुरे यांनी सूत्रसंचालन केले.