केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी (५ मे) राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) भेट दिली. मात्र एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी ठाकुर यांच्या भेटीवेळी विरोध दर्शवला. जोधपूर दंगल, जहांगिरपुरी येथील पाडकाम अशा घटना होत असताना माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सामाजिक अशांतता निर्माण केल्याचा आणि अशा व्यक्तीचं एफटीआयआय प्रशासन स्वागत करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

आंदोलक विद्यार्थी म्हणाले, “अनुराग ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये केलेले ‘देश के गद्दारों को, गोली मारों सालों को’ हे विधान देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचवणारे आहे. सध्याच्या सततच्या भीतीच्या काळात एफटीआयआयने नेहमीच लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्रागतिक वातावरणाचा पुरस्कार केला आहे.”

“ठाकूर यांची संस्थेला भेट म्हणजे एफटीआयआयच्या या वारशाला धोका आहे. त्यामुळे अनुराग ठाकूर यांच्या विधानाला विरोध दर्शवत आहोत,” असंही या विद्यार्थ्यांनी नमूद केलं. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी ‘एफटीआयआय विस्डम ट्री’ या फेसबूक पेजवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली.