शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.आज हडपसर गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्णवाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हडपसर येथील गाडीतळ ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत बंडखोर आमदाराची पाच रुग्ण वाहिकेमधून अंत्ययात्रा काढत, प्रतिकात्मक अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. यावेळी बंडखोर आमदाराच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले.तर घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी विजय देशमुख म्हणाले की, सूरत आणि गुवाहाटी मध्ये बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने हॉटेल मध्ये सुरक्षा पुरविली.जर तीच सुरक्षा काश्मिर मधील पंडितांना दिली असती,तर अनेक निष्पाप नागरिकाचे जीव वाचले असते. तसेच पूर परिस्थिती मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ही सुरक्षा व्यवस्था पुरविली गेली असती.तर अनेकांचा जीव वाचला असता ,मात्र हे भाजपचे केंद्रातील सरकारने त्या गोष्टीला प्राधान्य न देता,फोडाफोडीच्या राजकारणाला दिले आहे.त्या कृतीचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो.त्यामुळे जे तिकडे गेले आहेत.ते पुन्हा निवडून येणार नाहीत.पण एक सांगतो की,शिवसेना ही कार्यकर्ते,नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. हे सर्व बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवाव,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

पाहा व्हिडीओ –

तसेच ते पुढे म्हणाले की,आम्ही सर्व शिवसैनिक शेवटच्या श्वासा पर्यन्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्या सोबत असणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.