पुणे : घाऊक बाजारात मागणी वाढल्याने हिरवी मिरची, काकडीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून २० टेम्पो हिरवी मिरची, इंदूर येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून ४०० ते ४५० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ४५० ते ५०० गोणी सातारी आले, भेंडी ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ८ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ६ टेम्पो, गाजर ६ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, मटार ४०० ते ४५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो अशी आवक झाली.
पालेभाज्यांना मागणी
पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख ५० हजार जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली होती. पालेभाज्यांची आवक वाढली असून, मागणीही चांगली असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते २५००, मेथी – ८०० ते १६००, शेपू – ५०० ते १५००, कांदापात – १००० ते १८००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १००० ते २०००, राजगिरा – ४०० ते १०००, चुका- ५०० ते १०००, चवळई – ५०० ते १०००, पालक – १५०० ते २५००
कलिंगड, पपई, खरबूज, डाळिंबाच्या दरात वाढ
मागणीच्या तुलनेत आवक चांगली झाल्याने कलिंगड, पपई, डाळिंब, बोरे, खरबूजच्या दरात वाढ झाली. सीताफळ, लिंबाच्या दरात घट झाली असून, चिकू, अननस, माेसंबी, संत्री, पेरूचे दर स्थिर आहेत. रविवारी फळबाजारात मोसंबी ७० ते ८० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब ५० ते ६० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, अननस ३ ट्रक, बोरे १०० ते ११० गोणी, सीताफळ १५ ते २० टन अशी आवक झाली.
