पावलस मुगुटमल

पुणे : उत्तर भारतातून एकामागून एक उष्णतेच्या लाटा निर्माण होत असल्याने तीव्र झाळांनी नागरिक हैराण झाले आहेत. सध्या पुन्हा एकदा जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असून, दक्षिण आणि पूर्वोत्तर प्रांतातील काही भाग वगळता जवळपास ७५ टक्के भारताला उष्णतेचा तडाखा बसला आहे. रोजच टप्प्याप्प्प्याने वाढत असलेल्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एप्रिलच्या संपूर्ण महिन्यामध्ये विदर्भात तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली. उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातील राज्यांसह मध्य भारतात सध्या उष्णतेची लाट आहे. पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तीव्र झाली आहे. उत्तर भारतातील कमाल तापमानात पुढील दोन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातील तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात सध्या पावसाळी स्थिती आहे. मात्र, ती निवळणार असल्याने तापमानात आणखी वाढीची शक्यता आहे. विदर्भात सध्या अकोला, ब्रह्मपुरी आदी भागात ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. बहुतांश ठिकाणी ४२ ते ४४ दरम्यान तापमान आहे. मराठवाडय़ात परभणी येथे ४४ अंशांजवळ तापमान आले असून, इतरत्र ४२ अंशांपर्यंत कमाल तापमान गेले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा आदी भागात ४१ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाचा पारा गेला आहे. मुंबई उपनगरांमध्येही तापमानात मोठी वाढ असून, या विभागात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढला आहे.

आणखी ताप..

कमी-अधिक प्रमाणात उष्णतेची लाट पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून, मध्य प्रदेशसह विदर्भात ३० एप्रिलपासून त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत महाराष्ट्रात इतरत्रही तापमानातील वाढ कायम राहणार आहे.

कारण काय?

सध्या बंगालच्या उपसागरामधून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यातच महाराष्ट्रातही निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून कमाल तापमान सरासरीच्या पुढे जाऊन सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

लाटाग्रस्त राज्ये..

राजस्थानमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. त्यापाठोपाठ जम्मू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ आदी भागांत सध्या उष्णतेची लाट असून, ही स्थिती पुढील पाच दिवस कायम राहणार आहे. 

कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

अकोला ४५.४, अमरावती ४४.४, बुलढाणा ४२.३, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४३.५, नागपूर ४४.३, वाशिम ४३.०, वर्धा ४५.१, पुणे ४१.८, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्वर ३३.८, नाशिक ४१.१, सांगली ३९.३, सातारा ४१.२, सोलापूर ४३.४, औरंगाबाद ४२.४, परभणी ४३.८, मुंबई ३५.२, सांताक्रुझ ३७.०, अलिबाग ३५.१.

विदर्भाला अधिक त्रास.. 

विदर्भासह, राजस्थान, मध्य प्रदेशातील काही भागात सध्या ४५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद होत आहे. गुरुवारी (२८ एप्रिल) अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. ३० एप्रिलपासून मध्य प्रदेशामध्ये उष्णतेची लाट तीव्र होणार आहे. त्यामुळे  प्रामुख्याने अकोला, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र होणार आहे. कमाल तापमानाचा पारा ४६ अंशांपर्यंत किंवा त्यापुढेही जाण्याचा अंदाज आहे. गेल्या १०० वर्षांतील तापमानाचा उच्चांक यावेळी नोंदवला जाईल, अशी स्थिती आहे.