खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला मुसळधार पाऊस सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ८६ टक्क्यांवर पोहोचला. या चार धरणांपैकी पानशेत हे महत्त्वाचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे चारही धरणांत तब्बल दोन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाला.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये सध्या २५.२३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ८६.५६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात तब्बल १६० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १०० मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात ९० मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात १४ मि.मी. पाऊस पडला. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ६० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात ३४ आणि ३० मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात पाच मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी चारही धरणांत २३.०८ टीएमसी पाणीसाठा होता. बुधवारी सायंकाळपर्यंत हा पाणीसाठा २५.२३ टीएमसीपर्यंत पोहोचला. मुसळधार पावसामुळे २४ तासांत चारही धरणांत तब्बल २.१५ टीएमसीने पाणीसाठा वाढला असून पुणे शहराला दोन महिने पुरेल ए‌वढा पाणीसाठा वाढल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात ११० मि.मी. पाऊस पडला. या धरणात सध्या ७.३५ टीएमसी म्हणजेच ८६.३५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांच्या परिसरातही दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येडगाव, वडज, घोड, विसापूर, चासकमान, आंद्रा, कासारसाई, गुंजवणी, भामा आसखेड आणि वीर या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणात ४९.०२ टीएमसी म्हणजेच ९१.५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत टेमघर २.६० (७०.०८), वरसगाव ११.१५ (८६.९८), पानशेत १०.२५ (९६.३१), खडकवासला १.२३ (६२.१७), भामा आसखेड ७.५६ (९८.५८), पवना ७.३५ (८६.३५), डिंभे १०.८३ (८६.७२), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६२ (९८.१६), नीरा देवघर ९.५८ (८१.७२), भाटघर २०.०२ (८५.२०), वीर ९.३१ (९८.९३) आणि उजनी ४९.०२ (९१.५०)