पुणे : रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी शस्त्रसाठा असलेली बोट आढळल्यानंतर राज्यातील प्रमुख शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुणे पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर शस्त्रसाठा असलेली बोट आढळल्यानंतर तटरक्षक दल, राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच पोलिसांनी पाहणी केली. बोटीतील शस्त्रसाठा, बोटीची मालकी आदी बाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सुरक्षिततेचा आढावा घेऊन पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गुरुवारी (१८ ऑगस्ट) शहरातील महत्वाचे रस्ते तसेच शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथक, बाँब शोधक नाशक पथकाकडून शहरातील महत्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. संभाव्य घातपातीच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयास्पद वाहने, व्यक्ती तसेच बेवारस वस्तू सापडल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.