मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर सुटका करण्याच्या आदेशाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. पॅरोलचा आदेश महसूल विभागाकडून काढला जातो.
पुण्यातील विभागीय आयुक्तांनी संजय दत्तला महिन्याभरासाठी पॅरोल मंजूर केला आहे. मात्र संजय दत्त खोट बोलत असूनही, त्याला पॅरोल मंजूर झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. संजयने पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण पुढे केल्याने त्याला महिन्याभरासाठी पॅरोल मंजूर झाला आहे. मात्र दोन दिवसापूर्वीच मान्यता ‘र..राजकुमार’ चित्रपटाच्या प्रिमियरला हजर होती. यावेळी तिच्याकडे पाहून ती आजारी असल्याचे अजिबात वाटले नाही. ती ठणठणीत दिसत होती. माध्यमांमध्ये प्रिमियरला हजर असलेल्या मान्यताची छायाचित्रे झळकल्यानंतरही संजयला पॅरोल मंजूर झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.
मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. ऑक्टोंबर महिन्यात संजय दत्त स्वत:च्या आजारपणाचे कारण देऊन २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. दोन महिन्यात दुस-यांदा संजयला पॅरोल मंजूर झाल्याने संजय शिक्षेचा कालावधी पूर्ण करणार का ? अशा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे तसेच संजयला वारंवार पॅरोल मंजूर झाल्याने सर्वसामान्यांमध्येही कायद्याबद्दल एका चूकीचा संदेश जात आहे.