अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांना आफ्रिकेचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आज अमेरिका आफ्रिकन देशांबरोबर शिखर परिषदांचे आयोजन करीत आहे. जागतिक महासत्ता होण्यासाठी भारताने आफ्रिकेतील सर्व क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे, असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डम्मू रवि यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या 'भारत आणि आफ्रिका: जुने भागीदार, नवीन आव्हाने आणि संधी' या विषयावरील परिषदेच्या उद्घाटनावेळी रवी बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र- कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते. ‘सिम्बायोसिस सेंटर फॉर एंगेजमेंट विथ आफ्रिका’चे उद्घाटनही करण्यात आले. हेही वाचा - पुणे : शरद पवार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या एकाच व्यासपीठावर? हेही वाचा - ‘कसब्या’वर आता शिवसेनेचाही दावा रवी म्हणाले, भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांनी स्वातंत्र्यासाठी भरपूर संघर्ष केला. मात्र, आता २१ व्या शतकात आफ्रिकेत बदल झाला असून, आफ्रिकन देश आता संघर्षपूर्ण परिस्थितीत नाहीत. भारतीय कंपन्यांनी आफ्रिकेत उत्पादन केंद्र सुरू केले पाहिजे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांची व्याप्ती वाढेल. आफ्रिकेत पायाभूत सुविधांचा विस्तार करणे गरजेचे आहे. सिम्बायोसिससारख्या संस्थांनी आफ्रिकेत महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करावीत. आफ्रिकन मुलांचे भारतातील शिक्षण संपल्यावर त्यांना भारतात वर्क व्हिसा देण्याची गरज आहे. भारतात शिक्षण घेतलेले आफ्रिकन विद्यार्थी त्यांच्या देशात भारताचे भावी राजदूत म्हणून काम करतील, असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.