प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, असा ठराव प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसुचनेद्वारे मांडण्यात आला होता. त्याला एकमताने मान्यता देण्यात आली असून केंद्र सरकारकडे या संदर्भात शिफारस करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. शहरात टाटा मोटर्स समूहाचा मोठा उद्योग असून यामुळे शहरातील अनेकांना नोकरी मिळाली आहे. तसेच, अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे नाव मोठे होण्यात अश्या उद्योगसमुहांचा मोठा वाटा आहे.

याशिवाय, रतन टाटा यांनी नुकतेच मुंबईतील करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम्स उपलब्ध करून दिल्या होत्या. येवढेच नव्हे तर, रतन टाटा यांनी करोना विरुद्ध लढण्यासाठी १५०० कोटी रुपये पंतप्रधान मदत निधीत (PM Cares Fund) देणगी म्हणून जमा केला होता. करोनाशी दोन हात करण्यात देशासाठी त्यांनी मोठे योगदान केले आहे. त्यामुळे हा ठराव मांडण्यात आला. सर्वच नगरसेवकांनी तोंडाला मास्क बांधत सोशल डिस्टसिंगचे पालन केल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भारत रत्न देण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. उपमहापौर तुषार हिंगे यांनी हा प्रस्ताव मांडला, तर केशव घोळवे यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारकडे या संदर्भात शिफारस करण्यात आली आहे.