पिंपरी : उन्हाची तीव्रता वाढल्याने पिंपरी-चिंचवडला पाण्याची कमतरता भासू लागली आहे. अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने महापालिकेने औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) अतिरिक्त वाढीव पाच दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना, आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवनातून ५२० , आंद्रातून ९० आणि एमआयडीसीकडून ३० असे ६४० एमएलडी पाणी एका दिवसाला शहरवासीयांना वितरित केले जाते. उपलब्ध पाणी वाढत्या लोकसंख्येसाठी कमी आहे. त्यामुळे मागील सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतरही शहराच्या अनेक भागांतून अपुरा, विस्कळीत, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
भोसरी, माेशी, दिघी, चिखली, जाधववाडी, चऱ्होली, डुडुळगाव या भागातील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या तक्रारींंमुळे महापालिकेकडून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. यामध्ये वाढीव पाण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर आता पुन्हा अतिरिक्त पाच एमएलडी पाण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.
नळजोडवरून गोंधळ
पाणी देण्याबाबत एमआयडीसीची भूमिका सकारात्मक आहे. जलवाहिनीमधून नळजोड घ्यावेत, असे एमआयडीसीने महापालिकेला कळविले आहे. मात्र, एकाच ठिकाणाहून नळजोड (कनेक्शन) मिळावे, यासाठी महापालिका आग्रही आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तक्रारींमध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. एमआयडीसीकडून वाढीव पाच एमएलडी पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका