विवाहानंतर कुलदैवताचे दर्शन व कुळधर्म कुळाचाराप्रमाणे विधी करण्याची प्रथा असून, सध्या सर्वत्र लग्नसराईचा धूमधडाका सुरू झाल्याने महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची नगरी नवविवाहित जोडप्यांनी फुलून गेली आहे. एप्रिल महिन्यात विवाहाच्या तारखा जोरात असून सर्वत्र लग्नघाई दिसून येते. विवाहानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वी देवकार्य करण्याची प्रथा आहे. विशेषत: जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन, कुळधर्म कुळाचाराला विशेष महत्त्व आहे. जेजुरी गडावर शंकर व पार्वती हे खंडोबा व म्हाळसेच्या रूपात असल्याने जेजुरीला येऊन नवविवाहित दाम्पत्यांनी देवकार्य करण्याची प्रथा अनेक पिढय़ांपासून चालू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जेजुरी गडावर नवविवाहितांची मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पहिल्या पाच पायऱ्या वराने वधूला उचलून घेणे, देवदर्शन, तळीभंडार, कुळधर्म कुळाचाराप्रमाणे जागरण गोंधळ, लंगर तोडणे हा विधी येथे केला जात आहे. ऐतिहासिक चिंचेची बाग, पुजारी सेवक वर्ग यांच्या निवासात दररोज या विधीसाठी मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. नवविवाहितांनी जेजुरी नगरी फुलली असून, त्या अनुषंगाने जेजुरीच्या मुख्य महाद्वार पथावर भंडार खोबरे, हारफुले, नारळ, देवाचे टाक, फोटो, दिवटी, बुधली, प्रसाद तसेच रसवंतीगृह, उपाहारगृहे आदी दुकाने भाविकांनी फुलून गेली आहेत.