काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुण्यात एका वार्तालापासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशातल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यासोबतच पुणे प्रशासनाच्या कारभारावरही ताशेरे ओढले. कंगनाचे स्वातंत्र्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा जय श्रीराम म्हणण्यावरुन होणारा वाद असेल, अशा सगळ्या गोष्टींवर कन्हैय्या यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली मतं स्पष्ट केली. जय श्रीराम म्हटल्यावर राग का येतो? असा प्रश्न विचारला असता कन्हैय्या कुमार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, मला कधीच या गोष्टीचा राग येत नाही. एकतर माझं नाव आहे कन्हैय्या, माझ्या वडिलांचं नाव आहे जयशंकर आणि मी कुठून येतो, तर मिथिला नगरीतून. मिथिला माता जानकीची जन्मभूमी आहे. मग मला का राग येईल? मला नथुरामचा राग येतो, प्रभू श्रीरामाचा नाही. कंगना रणौतच्या स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या विधानाला कन्हैय्या कुमार यांचं उत्तर "स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत. म्हणून माझं एक आहे की मी अशा प्रकारच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझं माध्यमांना सांगणं आहे की तुम्हीही दुर्लक्ष करा".