पुणे : ‘बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांकडे लक्ष द्यावे ही आपली संस्कृती आहे. त्याचे पालन करत एकता आणि अखंडतेची मशाल अबाधित तेवत ठेवणे हाच युगधर्म आहे,’ असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘अल्पसंख्य समाजाने घाबरू नये’ हाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा संदेश होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘युवा अल्पसंख्याक संसदे’मध्ये सपकाळ बोलत होते. बिशप डाॅ. थाॅमस डाबरे, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, विवेक चव्हाण, संसदेचे संयोजक लुकास केदारी, सत्यवान गायकवाड, हाजी झुबेर मेमन, हाजी फरीद खान, फिरोज मसुलदार, सुलतान शाह या वेळी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, ‘विविधतेमध्ये एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. पण, काहींना ही एकता नको आहे. आम्ही सर्वांना जोडत आहोत. पण, समाजांना तोडणाऱ्या शक्ती प्रबळपणे काम करत आहेत. आमच्या हातामध्ये सुई-दोरा आहे. पण, दुसऱ्याच्या हातामध्ये कात्री असेल, तर काय करणार? बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांकडे लक्ष द्यावे, त्यांचे संरक्षण करावे, ही आपली संस्कृती आहे. एकता आणि अखंडतेची मशाल अबाधित तेवत ठेवणे हाच युगधर्म आहे.’
डाॅ. थॉमस डाबरे म्हणाले, ‘जीवन स्वार्थासाठी नाही तर दुसऱ्यांच्या भल्यासाठी आहे हे आपल्याला येशूने शिकविले आहे. तरुणांना कमी लेखू नका. त्यांना प्रोत्साहन द्या. तरुणांच्या प्रगतीमध्ये देशाचा विकास निश्चित आहे.’