भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (१ एप्रिल) तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचं म्हणत त्यांनी लवकर बॅग भरावी, असा खोचक सल्ला दिलाय. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्या म्हणाले, “आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक चिट्ठीत आपोआप अनिल परब यांचा आला आहे. अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आलं.”

हेह वाचा : “ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण रडत होते, कधी सुप्रिया सुळे…”

“नरेंद्र मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली”

“मी ३० तारखेला गेलो तेव्हाही मुलाखत दिली होती की माझा रिसॉर्टशी काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली. त्यात सर्व पुरावे दिलेत. म्हणून आता अनिल परब यांनी लवकर बॅग भरावी,” असा इशारा सोमय्या यांनी अनिल परब यांना दिला.

किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साई प्रसाद पेडणेकर यांच्या विरोधात गिरगाव कोर्टात भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाची याचिका दाखल झाली आहे. त्या प्रकरणाच्या देखील चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांची उलटी गणती सुरू झालीय. गृहमंत्री अनिल देशमुख असोत की दिलीप वळसे पाटील ठाकरे सरकारने पोलिसांचा उपयोग फक्त माफियागिरीसाठी केलाय. त्यांना आम्ही आव्हान दिलंय. त्यांची उलटी गिणती सुरू झालीय.”

“अर्जुन खोतकरांचा जालना सहकारी कारखाना ज्यांनी घेतला होता, त्यात विश्वास नांगरे पाटलांच्या पत्नीची गुंतवणूक आहे. आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीचे १६ टक्के शेअर्स आहेत. तो कारखाना ईडीने जप्त केला आहे,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले.