|| दत्ता जाधव दरवाढीसह देशांतर्गत विक्री; उत्पादकांना दिलासा पुणे : ओल्या काजूगराला स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो बाराशे-पंधराशे रुपये, तर देशांतर्गत बाजारपेठेत दोन ते अडीच हजार रुपये, असा समाधानकारक दर मिळत असल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक व्यापारी आणि कामगारांनाही आर्थिक फायदा होत असल्याने ही बाजारपेठ आणि संलग्न उद्योग विस्तारत आहेत. एकूण काजू उत्पादनापैकी सुमारे ४० टक्क्यांपर्यंत काजूगर विक्री होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आफ्रिकी देशातील काजू कमी किमतीत उपलब्ध होत असल्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना सुकविलेल्या काजूला प्रति किलो केवळ शंभर रुपयांच्या आसपास दर मिळत असल्याने नुकसान होत होते. त्यामुळे शेतकरी ओल्या काजूगर विक्रीला प्राधान्य देत आहेत. यंदा थंडी लांबल्याने काजूचा मोसमही लांबला आहे. परिणामी डिसेंबर महिन्यात मिळणारे काजूगर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मिळू लागले. हा हंगाम एप्रिलअखेर सुरू राहील. स्थानिक बाजारात १५०० रुपयांपर्यंत दर सध्या स्थानिक बाजारपेठेत शेकडा तीनशे ते चारशे रुपये, तर प्रति किलो बाराशे ते पंधराशे रुपये दराने ओले काजूगर विकले जात आहेत. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात काजूगर उपलब्ध होत असूनही दर स्थिर आहेत. पुणे, मुंबईसह देशातील हॉटेल व्यवसायातून ओल्या काजूगराला मागणी आहे. स्थानिक उद्योग, व्यवसायाला बळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही तरुण व्यावसायिक व उद्योजकांनी शेतकऱ्यांकडून ओल्या काजूगराची खरेदी सुरू केली आहे. काजूगराच्या आकारमानानुसार त्याचे पॅकिंग करून काजूगर ग्राहकांच्या मागणीनुसार देशभरात पाठविले जात आहेत. ओले काजूगर सोलणे, पॅकिंग, शीतकरण केंद्रे वाढत आहेत. काजूगराच्या घाऊक खरेदीसाठी स्थानिक उद्योजक तयार झाले तर काजू बियांपेक्षा काजूगरातूनच शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. धुके, अवेळी पावसामुळे कीड-बुरशीचा परिणाम होऊन ओल्या काजूगराचे उत्पादन यंदा पन्नास टक्यांवर आले आहे. शेकडा २५० रुपयाने शेतकऱ्यांकडून खरेदी होत आहे. काजू विक्रीबाबत राज्याच्या कृषी विभागाकडून काहीच मार्गदर्शन होत नाही. या व्यवहारावर कोणाचेच नियंत्रण नाही. थेट शेतकरी-व्यापारी, असा व्यवहार होत आहे. यंदा कीड-रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला पण, त्याबाबत काहीही मार्गदर्शन झालेले नाही. - सचिन राणे, कुणकवन, देवगड, जिल्हा रत्नागिरी सुकविलेल्या काजूपेक्षा काजूगराला जास्त दर मिळत असल्याने शेतकरी काजूगर विक्रीला प्राधान्य देत आहेत. अरबी देशांतूनही मागणी आहे. मात्र, शीतकरण, निर्यातीबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. चव चांगली असल्यामुळे वेंगुर्ला -७ आणि वेंगुर्ला -४, या जातींच्या काजूगराला मागणी जास्त आहे. कृषी विभागाने स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - नितीन गोलटकर, झारप, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग दोन कोटींपर्यंत उलाढाल संपूर्ण सिधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरीतील राजापूर, देवगड, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ला या भागातून ओल्या काजूगराच्या विक्रीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. सुमारे ३५ दिवसांच्या काळातच ओले काजूगर मिळतात. मागील पाच वर्षांपासून ही बाजारपेठ वेगाने विस्तारताना दिसत आहे. दोन जिल्ह्यांतून सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होते, अशी माहिती शेती तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीचे (आत्मा) वेंगुर्ला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोलम यांनी दिली आहे.