साहित्य निर्मितीमध्ये मानवी भावभावना आणि कल्पनाविलास असतो. त्याचबरोबरीने साहित्याची निर्मिती करताना संशोधनाची जोड देणे आवश्यक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनी रविवारी व्यक्त केले. विज्ञान आणि वाङ्मय या दोन्ही क्षेत्रात संशोधनामध्ये आपण कमी पडतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित पहिल्या विचार भारती संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने वासलेकर बोलत होते. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. वयाची ९० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांचा स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशितल आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. वासलेकर म्हणाले, विज्ञान आणि वाङ्मय यांच्यामध्ये समन्वय झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील मूलभूत तत्त्वज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. पाश्चात्त्य विचार हा विश्लेषणावर आधारित आहे. भारतीय तत्त्वज्ञान संश्लेषणाच्या पायावर उभे आहे. विचारांची चर्चा करताना आपण सैद्धांतिक गोष्टीवर भर द्यायला हवा. विज्ञान, संरक्षण आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन मोठय़ा प्रमाणावर झाले तर परकीय देशांवरील अवलंबित्व कमी होईल. त्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. उद्योजकांनीही तरुण संशोधकांना प्रोत्साहित केले पाहिजे. स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, जे लिहिले जाते आणि खपते ते सगळे साहित्य असते का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या वाचनातून माणसातील पापवृत्ती नाहीशा होतात ते उत्तम साहित्य. मात्र, जे वाचायला हवे ते शोधावे कसे हा प्रश्न आहे. माणसाचा विकास बुद्धीमुळे झाला आणि विचार हे बुद्धीचे खाद्य आहे. सद्गुणांनी जीवनाला सजविते अशा विचारप्रधान साहित्याची भारत ही जननी आहे. वैचारिक अस्पृश्यता नसलेली भारतीय संस्कृती ही विचारांची परंपरा आहे. समाजामध्ये स्वातंत्र्य विकारांचे नाही तर विचारांचे हवे हे ध्यानात घेतले पाहिजे. रावत आणि दातार यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.