पुणे : बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसाह्य मिळावे आणि मराठी भाषा पंधरवडा कालावधी बदलण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हे विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पत्र दिले. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या वेळी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याने २०१० मध्ये स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील ‘भाषा आणि साहित्य’अंतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मंडळांना अर्थसाह्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने योजना राबवण्यात येत होती. परंतु, २०२३ पासून ती बंद असून, हा बृहन्महाराष्ट्रातील मराठी बांधव आणि संस्थांवर अन्याय आहे. जिथे मराठी भाषा राज्याची आणि संवादाची मुख्य भाषा नाही, तिथे आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ही योजना तातडीने सुरू करावी.’
‘महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना, तसेच मराठी ग्रंथ प्रकाशनाचे कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाह्य देण्यात येत होते. देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्था आणि मंडळांना ५० लाख रुपयांचे अर्थसाह्य करण्यात येत होते. परंतु, २०२३ पासून हे अर्थसाहाय्य बंद आहे. या प्रश्नी लक्ष घालून हे अर्थसाह्य त्वरित सुरू करावे,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘मराठी पंधरवडा बदलावा’
‘शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. हा मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन आणि ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचा १४ मार्च स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींचा जागर हे औचित्य मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यासाठी अधिक योग्य आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून यापुढे मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा. याबाबतचा ठरावही दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला होता, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे,’ असे प्रा. जोशी यांनी सांगितले.