प्रत्येक साहित्य संमेलनाचे वैशिष्टय़पूर्ण बोधचिन्ह हे आजपर्यंतच्या संमेलनांची ओळख ठरले आहे. पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह स्पर्धेच्या माध्यमातून निवडण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
साहित्य संमेलनाचे, ते ज्या ठिकाणी होते त्याचे वैशिष्टय़ दाखवणारी बोधचिन्हे ही आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांची ओळख ठरली आहेत. पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह स्पर्धेच्या माध्यमातून निवडण्यात येणार असून विजेत्याला २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांनी दिली आहे.
या स्पर्धेत विद्यार्थी, चित्रकार, जाहिरात एजन्सी कुणीही सहभागी होऊ शकते. प्रथम परितोषिकाशिवाय ५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. बोधचिन्ह पाठवण्यासाठी १२ सप्टेंबपर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धक ‘८९ व्या साहित्य संमेलनाचे मध्यवर्ती कार्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसर, पिंपरी’ या पत्त्यावर कागद किंवा सीडी पाठवू शकतात. त्याचप्रमाणे sahityasammelan@dpu.edu.in या पत्त्यावर ई-मेल करू शकतात.