पुणे : ‘स्कूल बस आणि व्हॅनमधून होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, या विषयीच्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालक, शिक्षक-पालक आणि प्रशासनाने जागरूक राहिले पाहिजे,’ असे मत राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील दोन हजार विद्यार्थ्यांना मिसाळ यांच्या हस्ते शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मिसाळ बोलत होत्या. माजी नगरसेवक महेश वाबळे, आनंद रिठे या वेळी उपस्थित होते.
‘वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांची दर आठवड्याला अल्कोहोल चाचणी, पोलीस पडताळणी, अपघात किंवा गुन्ह्याचा इतिहास तपासणी, वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा, पॅनिक बटन, अग्नी नियंत्रण स्प्रिंकलर, महिला अटेंडंट या बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. स्कूल बसचालकांनी या नियमावलीची जबाबदारीने अंमलबजावणी करावी,’ असे मिसाळ यांनी सांगितले.