पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्ध लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांना ज्येष्ठ भाषा अभ्यासक-लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत मसाप जीवनगौरव पुरस्कार, तर गीताली वि. मं. यांना डाॅ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.परिषदेच्या १२० व्या वर्धापनदिनानिमित्त माधवराव पटवर्धन सभागृहात २७ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

जोशी म्हणाले, “उचल्या’ या आत्मकथनाने लक्ष्मण गायकवाड यांना वेगळी ओळख मिळवून दिली. ‘उचल्या’ साहित्यकृतीला १९८८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आजवरच्या आपल्या लेखनातून गायकवाड यांनी परिघाबाहेरील उपेक्षितांच्या व्यथा-वेदना मांडून त्यांचा आवाज बुलंद केला आहे. या योगदानाबद्दल त्यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला समाधान वाटत आहे. डॉ. गीताली वि. मं. यांनी स्त्री-मुक्तीच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. स्त्रीवादी चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत असताना डॉ. गीताली वि. मं. यांच्या कार्याचा गौरव करताना परिषदेला आनंद होत आहे.’