पुणे : राज्य मंडळातर्फे राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांपैकी १० टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत. तसेच, १९१ संवेदनशील केंद्रांपैकी ४२ केंद्रांवरही सीसीटीव्ही नसल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी यांनी दिली.
राज्यात दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (२० फेब्रुवारी) सुरू होत आहे.
गेली काही वर्षे दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती, राज्यस्तरीय दक्षता समिती, भरारी पथके, बैठी पथके, पोलिस बंदोबस्त अशा उपाययोजना करण्यात येतात. यंदा राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९० टक्क्यांपेक्षा अधिक केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध झाले आहेत. मात्र, नुकत्याच सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत काही ठिकाणी सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर, दहावीच्या परीक्षेत, विशेषत: सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्याचे आव्हान राज्य मंडळासमोर निर्माण आहे.
डॉ. बेडसे म्हणाले, ‘दहावीच्या परीक्षेच्या काळात गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात राज्य मंडळाकडून २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. विभागीय मंडळातर्फे विशेष भरारी पथके स्थापन केली आहेत.
मंडळ सदस्य आणि जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्यात येणार आहेत. दहावीच्या परीक्षा केंद्रांपैकी ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांपैकी ५५४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. तर, १९१ संवेदनशील केंद्रांपैकी ४२ केंद्रांवर सीसीटीव्ही नाही. त्यामुळे या केंद्रांवर अधिक लक्ष दिले जाणार आहे.’
राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबरला बैठक झाली. या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडित कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले.

