ज्याचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास नाही, तोच हुंडा घेईल आणि असे हुंडा घेणारे तरुण नामर्द असतील, असे स्पष्ट मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी भोसरीत व्यक्त केले. मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, असे सांगत येथील लोकं संयमी आहेत, त्याचा उगीचच गैरफायदा घेऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. भोसरीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आयोजित मराठवाडा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, आयोजक एकनाथ पवार आदी उपस्थित होते.मराठवाडय़ाला हुंडय़ाचा शाप आहे. मात्र हुंडा घेणे नामर्दपणाची निशाणी आहे. बहुतेक पाहुणे मंडळी रिकामीच असतात. लग्नातील मान-पान, देणं-घेणं याच्यातच त्यांचे स्वारस्य असते, याकडे लक्ष वेधल्यानंतर अनासपुरे म्हणाले, मराठवाडय़ातील लोकं सहनशील आहेत. मात्र, अतिसहनशीलता काही कामाची नाही. मराठवाडय़ाचे हक्काचे पाणी मराठवाडय़ाला मिळाले पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भांडण्याची तसेच वाचा फोडण्याची गरज आहे. वेळप्रसंगी भांडले पाहिजे. सहनशील आहेत म्हणून मराठवाडय़ावर अन्याय होता कामा नये. मराठवाडय़ातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, याची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. ‘नाम’ च्या माध्यमातून ५६२ किलोमीटरचे काम सहा महिन्यात केले. कारण, लोकसहभाग महत्त्वाचा आहे. देण्याची वृत्ती आतून असावी लागते.