मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने, समाजात प्रचंड नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात बैठका सुरू आहेत. राज्य सरकारने योग्य ती बाजू न्यायालयात मांडावी यासाठी, मराठा समाज १७ सप्टेंबर रोजी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की, मराठा समज आरक्षणाच्या मागणीसाठी कित्येक वर्षांपासुन लढा देत आहे. मात्र आता न्यायालयाने स्थगिती दिल्याने, समाजातील तरुणवर्ग चिंतेत पडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अध्यादेश न काढता स्थगिती उठविण्यासाठी न्यायाधीशांना विनंती करावी.आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र त्या दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा न करता गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

आणखी वाचा- मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची कधीच इच्छा नव्हती; चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका

तसेच ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी जी प्रवेश आणि नियुक्त्यांबाबत निवड जाहीर झालेली आहे. त्या सर्व संरक्षित करण्यात याव्यात. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे, ते शासनाने होऊ देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश जाहीर झाल्यावर, तो आदेश न्यायालयाच्या वेबसाईटवर आला नसताना. शिक्षण विभागाने मराठा समाजाच्या प्रवेशावर तातडीने स्थगिती देऊन चुकीचे केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- “जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण”

आता या आरक्षणाच्या स्थगितीबाबत मराठा समाज गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी यांना घेराव घालून निषेध करणार आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.